Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

विसापुरात खून : महिलेसह चौघांना पोलिस कोठडी

विसापुरात खून : महिलेसह चौघांना पोलिस कोठडी





सांगली : खरा पंचनामा

शेताच्या बांधावर असलेले सीताफळाचे झाड तोडल्याच्या कारणावरून खून केल्याप्रकरणी एकाच कुटुंबातील चौघांना अटक करण्यात आली. विसापूर (ता. तासगाव) येथे मंगळवारी सकाळी साडेपाचच्या सुमारास मारहाणीची घटना घडली. यामधील जखमीचा तासगाव येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरू असताना बुधवारी रात्री मृत्यू झाला. याप्रकरणी अटकेतील चौघांना दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

राजेंद्र धोंडीराम माळी, सुरेखा राजेंद्र माळी, रोहित ऊर्फ संकेत राजेंद्र माळी, राहुल ऊर्फ अमित राजेंद्र माळी अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. संदीप माळी असे मृताचे नाव आहे. मृत संदीप याची पत्नी कोमल यांनी फिर्याद दिली आहे. 

संदीप माळी याची विसापूर येथे तीन गुंठे जमीन आहे. या जमिनीच्या बांधावर असलेली सीताफळाची झाडे त्याने तोडली होती.  बांधावरील झाडे तोडल्याचा राग राजेंद्र माळी आणि त्याच्या कुटुंबियांना होता. त्याचा जाब विचारण्यासाठी ते संदीप याच्या घरी गेले होते. त्यावेळी त्यांच्यात वाद झाला. काही वेळानंतर हा वाद पुन्हा उफाळून आला. त्यावेळी संशयितांनी संदीपला जबर मारहाण केली. तर लाकडी दांडक्याने त्याच्या डोक्यात मारहाण केली होती. जखमी संदीपचा बुधवारी रात्री उपचार सुरू असताना मृत्यू झाला. त्यानंतर संशयितांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

घटना घडल्यानंतर पोलिस निरीक्षक भानुदास निंभोरे यांनी तातडीने सूत्रे फिरवत चारही संशयितांना अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चारही संशयितांना दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.