Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

शासकीय अधिकाऱ्यांना बदल्यांसाठी आता करावे लागणार वेटिंग बदल्यांना ३० जूनपर्यंत मुदतवाढ

शासकीय अधिकाऱ्यांना बदल्यांसाठी आता करावे लागणार वेटिंग
बदल्यांना ३० जूनपर्यंत मुदतवाढ



मुंबई : खरा पंचनामा

राज्य शासनामार्फत दरवर्षी एप्रिल आणि मे महिन्यात शासकीय अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय आणि विनंती बदल्या करण्यात येतात. राज्य उत्पादन शुल्क, पोलिस विभागातील काही वरीष्ठ आयपीएस अधिकारी, उपअधीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. तर दीडशे पोलिस निरीक्षकांना पदोन्नती देण्यात आली आहे. त्याशिवाय आरटीओमधील काही अधिकारी, सार्वजनिक बांधकाम, सहकार तसेच अन्य विभागातील बदल्या आतापर्यंत करण्यात आल्या आहेत. मात्र आता उर्वरित बदल्यांना दि. ३० जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. याबाबतचा आदेश मंगळवारी राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या कक्ष अधिकारी विद्या भोईटे यांच्या सहीने काढण्यात आला आहे.  

राज्य शासनाने यापूर्वी उत्पादन शुल्क विभागातील अधीक्षक, उपअधीक्षक, निरीक्षक, दुय्यम निरीक्षक यांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत. अनेकांनी बदल्यांच्या ठिकाणी कार्यभार स्विकारला आहे. पोलिस विभागातील काही वरीष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. तसेच उपअधीक्षकांच्याही मोठ्या प्रमाणात बदल्या केल्या आहेत. अनेक पोलिस निरीक्षकांना उपअधीक्षक पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. मात्र पोलिस निरीक्षक, सहायक निरीक्षक आणि उपनिरीक्षक यांच्या बदल्या अद्यापही झाल्या नाहीत. आता मुदतवाढ दिल्याने या बदल्या जून अखेरीस होण्याची शक्यता आहे. शिवाय सहायक निरीक्षक, उपनिरीक्षकांच्या पदोन्नतीचेही आदेश अद्याप काढण्यात आलेले नाहीत. 

राज्य शासनातील अन्य विभागातील अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्याही रखडल्या आहेत. सार्वजनिक बांधकाम, आरटीओ, सहकार विभागातील काही अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. महसूल विभागातीलही काही अधिकाऱ्यांच्याही बदल्या करण्यात आल्या आहेत. मात्र जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, प्रांताधिकारी आणि तहसिलदार प्रवर्गातील अजूनही काही बदल्या झालेल्या नाहीत. मात्र गेली दोन वर्षे रखडलेल्या बदल्यांना पुन्हा एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आले आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. 

अधिकाऱ्यांना मुलांच्या शैक्षणिक वर्षाची चिंता
बदल्यांना ३० जूनपर्यंत मुदतवाढ दिल्याने अधिकाऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत. अनेक अधिकारी मे अखेरीस बदल्या होतील या आशेवर मानसिक तयारी केली होती. कार्यकाल पूर्ण झाल्याने जिल्ह्यातून बदली होऊन जाणाऱ्या अधिकाऱ्यांना आता वेगळीच चिंता सतावत आहे. जूनच्या मध्यापर्यंत नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे. त्यामुळे बदली होणार की नाही याचा निर्णय जून अखेरीस होणार असल्याने मुलांच्या शाळा, कॉलेजचे प्रवेश आहे तिथेच घ्यायचा की बदली झालेल्या ठिकाणी अशा द्विधा मनस्थितीत अधिकारी आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.