राज्यातील १० पोलिस प्रशिक्षण केंद्रांची प्रवेश क्षमता वाढणार
सांगलीतील तुरची केंद्राचाही समावेश, राज्य शासनाचा निर्णय
मुंबई : खरा पंचनामा
राज्यातील दहा पोलिस प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थ्यांची प्रवेश क्षमता वाढवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. दोन टप्प्यात याची कार्यवाही करण्यात येणार आहे. टोन टप्प्यांत मिळून पाच हजारांनी ही क्षमता वाढवण्यात येणार आहे. याबाबतचे आदेश राज्य शासनाचे कार्यासन अधिकारी गणेश गायकवाड यांच्या सहीने काढण्यात आले आहेत. सांगली जिल्ह्यातील तुरची पोलिस प्रशिक्षण केंद्रातील संख्याही पाचशेने वाढवण्यात येणार आहे.
पहिल्या टप्प्यात मरोळ, नानवीज-दौंड, सोलापूर, जालना, नागपूर येथील प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थ्यांची संख्या प्रत्येकी पाचशेने वाढवण्यात येणार आहे. सध्या मरोळ येथे ५००, नानवीज-दौंड येथे ८०० तर सोलापूर, जालना, नागपूर येथे प्रत्येकी १२०० जणांना प्रशिक्षण दिले जाते. दुसऱ्या टप्प्यात खंडाळा, तुरची-सांगली, बाभूळगाव-लातूर, धुळे, अकोला येथील प्रशिक्षणार्थ्यांची संख्याही प्रत्येकी पाचशेने वाढवण्यात येणार आहे. सध्या खंडाळा, तुरची, धुळे येथे प्रत्येकी ६०० तर बाभूळगाव येथे ९०० अकोला येथे ८०० प्रशिक्षणार्थी आहेत.
सध्या दहाही प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थ्यांची संख्या ८ हजार ४०० इतकी आहे. आता ती पाच हजारांनी वाढून १३ हजार ४०० इतकी करण्यात येणार आहे. याला राज्य शासनाने प्रशासकीय मान्यताही दिली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.