Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

"राज्यपालपदासाठी 8 दिवस वाट पाहीन, नाहीतर राणांचं जातवैधता प्रमाणपत्र प्रकरण बाहेर काढीन"

"राज्यपालपदासाठी 8 दिवस वाट पाहीन, नाहीतर राणांचं जातवैधता प्रमाणपत्र प्रकरण बाहेर काढीन"



अमरावती : खरा पंचनामा

शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री आनंदराव अडसूळ हे चांगलेच आक्रमक झाले आहेत.'

राज्यपालपदासाठी 8 दिवस वाट पाहणार अन्यथा नवनीत राणा यांचं जातवैधता प्रमाणपत्राचं प्रकरण बाहेर काढणार' असा इशारा अडसूळ यांनी दिला आहे. त्यामुळे माजी खासदार नवनीत राणा यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच अडसूळ यांच्या या भूमिकेमुळे महायुतीतही धूसफूस सुरू होऊ शकते.

भारतीय जनता पक्षाने राज्यपाल पदाचे आश्वासने दिले होते, मात्र ते पाळले नसल्याचाही आरोप अडसूळ यांनी केला आहे. त्यामुळेच अडसूळ यांनी आता ही आक्रमक भूमिका घेत आठ दिवस वाट पाहू असे जाहीर केले आहे. सर्वोच्च न्यायालयाने नवनीत राणा यांच्या जात वैधता प्रमाणपत्राबद्दल जो निर्णय दिला होता तो अयोग्य होता, असा अडसूळ यांचा आरोप आहे. त्यामुळे नवनीत राणा यांना दिलेल्या जातवैधता प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असा इशाराही माजी मंत्री आनंदराव अडसूळ यांनी दिला आहे. त्यामुळे माजी खासदार नवनीत राणा यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

काही महिन्यांपूर्वी देशभरात लोकसभा निवडणूका पार पडल्या. त्यावेळी राज्यातील अमरावतील लोकसभा मतदार संघात महायुतीत भाजपातर्फे नवनीत राणा यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यांच्याविरोधात महायुतीतील शिवसेनेचे आनंदराव अडसूळ होते. दुसरीकडे प्रहारचे बच्चू कडू यांनी आपला उमेदवार जाहीर केला होता. नवनीत राणाविरुद्ध दोन्ही नेते माघार घेण्याच्या तयारीत नव्हते. परंतु अखेर आनंदराव अडसूळ यांनी माघार घेतली.

अमित शाह यांच्यासोबत झालेल्या त्या बैठकीनंतर अडसूळ यांनी माघार घेतली. त्या बैठकीत अमित शाह यांनी अडसूळ यांना राज्यपाल करण्याचे आश्वासन दिले होते. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते, असा दावा अडसूळ यांनी केला होता.

'मला देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल करण्याचे सांगितले. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मला बोलवले. त्यांनी अमरावतीची जागा भाजपला हवी असल्याचे सांगितले. महायुतीचा घटक पक्ष असल्यामुळे मी माघार घेतलीय त्यावेळी अमित शाह यांनी मला राज्यपाल करण्याचा शब्द दिला. बैठकीला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सुध्दा उपस्थित होते' असे आनंदराव अडसूळ यांनी सांगितले.

मात्र आता लोकसभा निवडणुका होऊन बराच कालावधी उलटला आहे. मात्र आता देशातील विविध राज्यातील राज्यपालांची एक नवी लिस्ट निघाली, त्यामध्ये माझं नाव नाहीये. तरी मी संयम ठेवला, दोन दिवसांनी भाजप नेत्यांना जाऊन भेटलो. लोकसभा निवडणुकीवेळी जे आश्वासन देण्यात आलं होतं, त्याची आठवण करून दिली, असे अडसूळ यांनी सांगितलं.

राज्यपाल पदासाठी अजून आठ दिवस वाट बघतो, नाहीतर नवनीत राणा यांच जात वैधता प्रमाणपत्राचं प्रकरण पुन्हा बाहेर काढेन, असा इशारा त्यांनी दिला. नवनीत राणा यांच्या मुळे माझं खूप नुकसान झालं आहे. तेव्हा (लोकसभेत) मला उमेदवारी दिली असती तर मी निवडुन आलो असतो आणि मंत्री देखील झालो असतो, असेही अडसूळ म्हणाले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.