Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

"माझी पोलीस सुरक्षा व्यवस्था तातडीने काढा."

"माझी पोलीस सुरक्षा व्यवस्था तातडीने काढा."



मुंबई : खरा पंचनामा

'राज्यात कायदा-सुव्यवस्था बिघडत चालली आहे. पोलिसांवर प्रचंड ताण येत आहे. त्यामुळे माझी पोलीस सुरक्षा व्यवस्था तातडीने काढा', अशी विनंती राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

बदलापुरातील शाळेत शिकणाऱ्या दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेनंतर महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटताना दिसत आहेत. आता या प्रकरणावरुन सुप्रिया सुळे यांनी एक ट्वीट केले आहे. त्यात त्यांनी गृहमंत्र्यांकडे एक मोठी विनंती केली आहे.

सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटरवरुन एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना टॅग करत एक विनंती केली आहे. 'माझी पोलीस सुरक्षा व्यवस्था तातडीने काढा. राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडत चालली आहे. पोलिसांवर प्रचंड तणाव येत आहे. त्यातच राजकीय नेत्यांना पोलीस संरक्षण दिलं जात आहे. त्यामुळे माझे पोलीस संरक्षण काढून ते जनतेच्या सेवेत द्यावे', अशी विनंती सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

'महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती गेली काही महिन्यांपासून अतिशय गंभीर आहे. जनता असुरक्षित वातावरणात जगत असून सततच्या अप्रिय घटनांमुळे नागरिकांच्या मनामध्ये भीतीचे वातावरण आहे. महिला, अबालवृद्ध कुणीही सुरक्षित नाहीत. गुन्हेगार निर्वावले असून कायद्याचा धाक उरलेला नाही. यंत्रणा राबविताना पोलीस यंत्रणेवर प्रचंड मोठा ताण पडतोय, हे स्पष्टपणे दिसत आहे.

दुसरीकडे माझ्यासह अनेक आजी-माजी लोकप्रतिनिधींच्या सुरक्षेसाठी मोठी पोलीस यंत्रणा काम करत आहे. परंतु एका बाजूला कायदा व सुव्यवस्था राखण्यात पोलीस यंत्रणेचं बळ कमी पडत असताना दुसरीकडे ही सुरक्षा घेणं योग्य नाही. म्हणून गृहमंत्र्यांना माझी विनंती आहे की कृपया माझ्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेली पोलीस सुरक्षा तातडीने काढून घ्यावी. माझ्या सुरक्षेसाठी दिलेले हे पोलीस अधिकारी जनतेच्या सुरक्षेसाठी नियुक्त करावेत.

यासोबतच राज्यातील ज्यांना ज्यांना सुरक्षा व्यवस्था दिली आहे, त्या सर्वांच्या सुरक्षेच्या गरजेबाबत तातडीने आढावा घ्यावा व ज्यांना गरज नाही, त्यांची सुरक्षा काढून ते पोलीस कर्मचारी जनतेच्या सुरक्षेसाठी देण्यात यावे. राज्यातील कायदा व सुव्यवस्था चोख राहावी व जनतेला सुरक्षित वातावरण मिळावे यासाठी गृहमंत्र्यांनी हा निर्णय तातडीने घ्यावा ही नम्र विनंती', असे ट्वीट सुप्रिया सुळे यांनी केले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.